संजय बोथरा,
चाकण, ( हवेलीनामा प्रतिनिधी) : आई वडील गुरु यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी सतत कृतिशील असणे हे जीवनाच्या यशस्वीतेचे गमक आहे. या विचाराचा अंगीकार समाजातील प्रत्येक घटकांनी केला पाहिजे असे मत जैन धर्मीय संत पन्यास महाबोधी विजय यांनी केले.
देशभर पदयात्रेने भ्रमण करीत असताना संत महाबोधी विजय यांचे चाकण येथे आगमन झाले. यावेळी प्रवचन आयोजित करण्यात आले होते. प्रवचनासाठी चाकण व परिसरातील जैन व जैनेतर बांधव उपस्थित होते . आई-वडिलांचे महती या विषयावर महाराज साहेबांनी अनेक प्रवचने केली आहेत. याशिवाय मराठी, हिंदी, इंग्रजी ,गुजराती आदी भाषातून प्रसिद्ध झालेल्या विविध विषयावरील पुस्तकांच्या दोन लाखाहून अधिक प्रती प्रसिद्ध झाल्या आहेत. आज समाजात जेष्ठ नागरिकांची उपेक्षा होत असल्याचे हृदय द्रावक चित्र दिसून येत आहे , त्यामुळे वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे चित्र बदलणे आवश्यक असून यासाठी आजच्या तरुण पिढीने पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
समाजात आजच्या परिस्थितीत दुःखमुक्ती , पाप मुक्ती याची गरज आहे मात्र याहीपेक्षा ऋणमुक्तीची अधिक श्रेष्ठता लक्षात घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमात विहार सेवा करणाऱ्या चाकण येथील युवकांचे कौतुक केले . सकल जैन संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
