पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] लवकरच इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेस सुरुवात होत असून यावर्षी विद्यार्थ्यांना परिक्षेचे नियम कठीण करण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांकडून परिक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्नपत्रिका मिळवणे, विकणे आणि विकत घेतल्यास किंवा मोबाईलवर अथवा अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर पाठवला तर परीक्षार्थी विद्यार्थ्याची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यास पुढील ५ वर्षांच्या परीक्षांना प्रतिबंध करण्यात येणार आहे, तसेच परीक्षार्थ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा देखील नोंदविण्यात येणार आहे.
इयत्ता १२ वी २१ फेब्रुवारी ते २१ मार्च आणि इयत्ता १० वी ची परीक्षा २ ते २५ मार्च या दरम्यान पार पडणार आहे. यासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे; मात्र गेल्या २ वर्षांत झालेल्या परीक्षांच्या अनेक नियमांत यंदा बरल करण्यात आला आहे. यात कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी काही कठोर नियमावली घोषित करण्यात आली आहे. मागील २ वर्षांत कोरोनाची परिस्थिती पहाता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी काही प्रमाणात सूट देण्यात आली होती; मात्र आता या नियमात मंडळाने पुन्हा पूर्वीप्रमाणे परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
