सांगली [हवेलीनामा वृत्तसमुह] प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून माध्यान्ह भोजन योजना चालू असून हा पोषण आहार शाळेत बनवला जातो परंतु काहीवेळा यात निष्काळजीपणा झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतू शकते.अशीच एक घटना सांगली शहरात घडल्याचे उघड झाले, शाळेमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे प्रकार घडला आहे. सुमारे 32 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार, विजयनगर इथल्या वानलेसवाडी हायस्कूल येथील पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या पोषण आहारातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. मळमळ, उलटी आणि जुलाब हा प्रकार सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी तातडीने या मुलांना स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टरांना बोलून दाखवले. मात्र, त्रास अधिकच वाढत असलेल्या विद्यार्थ्यांना 32 विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आणि उत्तम असल्याचा माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेतली होती. यातील काही विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
