पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांना जोडणारा केंद्राचा महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाकडे पाहिले जाते. या प्रकल्पामुळे तीन जिल्हे एकमेकांना जोडले जाणार आहेत. याचा लाभ भागातील प्रवाशांना ये-जा करणे सोयीचे जाणारा आहे तसेच या भागांतील उद्योगांना देखील हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात सांगितले तर रेल्वेमंत्र्यासोबत याच महिन्यात बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही दिले. त्यानुसार शुक्रवारी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसोबत बैठक निश्चित झाली असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या रेल्वे प्रकल्पासाठी हवेली तालुक्यातील १२ गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे, त्यापैकी सात गावांची मोजणी पूर्ण झाली असून अन्य गावांची मोजणीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होइल तर दोन गावांसाठी नगररचना विभागाकडे परवानगी मागण्यात आली आहे. त्यापैकी एक परवानगी केंद्रांकडून रखडली आहे. तसेच नवीन अलाइन्मेंटनुसार संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी माहिती हवेलीच्या भूसंपादन अधिकारी रोहिणी आखाडे यांनी दिली.
तसेच खेड तालुक्यातील एकूण २१ गावांमधून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. त्यापैकी १२ गावांमधील केळगाव हे गाव रद्द करण्यात आले आहे. त्या गावांमध्ये संरक्षण खात्याचे बॉम्बनिर्मितीचा कारखाना असल्याने हे गाव वगळण्यात आल आहे.आता केळगाव ऐवजी भोसे गावातून हा मार्ग जाणार आहे. या गावांमधील मोजणीची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही. मोजणीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. त्यानंतर सुनावणी होऊन पुढील प्रक्रिया सुरू होईल. तसेच या गावांतील जागांच्या दर निश्चितीची प्रक्रिया पण पूर्ण करण्यात येईल, असे खेड तालुक्याचे भूसंपादन अधिकारी विक्रम चव्हाण यांनी सांगितले.
