नाशिक [हवेलीनामा वृत्तसमुह] शिक्षणापासून कुणीही वंचित राहणार नाही तो मुलांचा मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले जात असतांना नाशिकमध्ये शाळा यूनिट बंद केल्याने या मुलांनी चक्क पुस्तक घ्या आणि बकऱ्या द्या अशा घोषणा देत आपले गाऱ्हाणे मांडले.पटसंख्या कमी असल्याच्या कारणाने नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथील शाळा यूनिट बंद करण्यात आले आहे.आदिवासी भागातील दरेवाडी हे चाळीस कुटुंबियांचे गांव,येथील मुलांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून शाळा सुरू करण्यात आली होती, मात्र आता पटसंख्या नसल्याने शाळा बंद करण्यात आली आहे.
यावर विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना पत्र देत शाळा सुरू करण्याची मागणी केली असून ज्यांनी हा निर्णय घेतला त्यांच्यावर कारवाईची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. शाळा सुरू करावी यासाठी दरेवाडी येथील नागरीकांनी, शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते, परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने अनोखे आंदोलन करावे लागले.
पटसंख्येच्या मुद्द्यावरून राज्यातील अनेक शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याच तत्वावर इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथील शाळेला याचा फटका बसला आहे.
