पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) अलिकडे तरुणांमधील विलासीवृत्ती व उपभोग याकडे मोठ्याप्रमाणात कल वाढल्याने जबाबदारी झटकवून टाकण्याचे प्रमाण वाढले आहे,परिणामी कुटूंब व्यवस्था हळूहळू उध्वस्त होताना दिसते आहे याचा गंभीर परिणाम समाजाबरोबरच देशाच्या आर्थव्यवस्थेवर पडतो आहे.पाश्चात्य देशात चंगळवाद फोफावला वयस्क तसेच लहान मुलांचे संगोपन करण्याची कुटूंबातील तरुणांची जबाबदारी काही प्रमाणात तेथील शासन व्यवस्था उचलू लागल्याने हे तरुण यापासून दूर जाऊ लागले आज या सर्वाचा दुष्परिणाम पुढे येत आहे यासाठी भारतीय कुटूंब व्यवस्था हीच देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावत राहील असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कुटुंब प्रबोधन गतीविधी संयोजक संजय कुलकर्णी यांनी आपले विचार व्यक्त केले.
अमेरिकेने 1980 मध्ये सोशल सिक्युरिटी हा कायदा आणल्यामुळे आज आणि पुढील काळात अमेरिकेसमोर सामाजिक व आर्थिक समस्या निर्माण होत आहे याचे दाखल्यांसह विश्लेषण केले. आज अमेरिकेत या कायद्यामुळे सर्व वरीष्ठ नागरिकांची जबाबदारी सरकारलाच उचलावी लागत आहे हे सांगितले, त्यामुळे कुटुंबातील जबाबदारी टाळणे, काडीमोड, सरकारवरील आर्थिक भार इत्यादी अनेक समस्यांनी राक्षसी रुप धारण केले हे सांगितले. भारतातही कुटुंबव्यवस्था डामाडौल तर होत नाही ना अशी शंका त्यांनी उपस्थित केली.1990 सालच्या जागतिक व्यापार धोरणातील धूर्त तरतुदींमुळे अनावश्यक खरेदी आणि बँकाच्या क्रेडिट कार्ड मुळे होणाऱ्या दिवाळखोरीचे उदात्तीकरण हे एक प्रकारे भारतीयांच्या मानसिकतेवर अयोग्य परिणाम करत आहे असे ते म्हणाले.भविष्यातील तरतूदी ऐवजी येणाऱ्या उत्पन्नातील पैसे अगोदरच खर्च करायचे असे फॅड अस्तित्वात आले परिणामी कर्जबाजारीपणा वाढीस लागला कौटुंबिक कलह वाढत गेले.पाश्चात्य देशात तर याचे भयंकर परिणाम पुढे आले घटस्फोटाचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले.याचा विचार आपण करणार आहोत का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
भारतात कुटुंबाचा आकार दिवसेदिवस अतिशय लहान होत असून आपण जर वेळीच जागरुक झालो नाही तर कुटुंबव्यवस्थाच संपुष्टात येऊ शकते हे प्रत्यक्ष दाखले देऊन त्यांनी स्पष्ट केले. ‘कुटुंब प्रबोधन’ गतीविधी क्षेत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्य करत असून समाजातील सर्वांनीच कुटुंबव्यवस्था टिकून रहावी यासाठी प्रयत्नशील रहावे व योगदान करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दिवाळी फराळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यासाठी राजकीय, धार्मिक, प्रसारमाध्यमे या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यात हडपसर भागाचे संघचालक प्रविणजी पाताळे यांनी संघाच्या कार्याबद्दल माहिती दिली,सुत्रसंचालन भाग प्रचार प्रमुख डॉ. महेश देशपांडे यांनी केले.सांघिक पद्य कोंढवा नगर प्रचार प्रमुख विनायक भालेराव यांनी म्हटले.भाग सद्भावना गतीविधी संयोजक प्रकाश शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.
