पुणे (हवेलीनामा वृत समूह) महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे सभासद असलेल्या नायगाव येथील जेष्ठ व्यक्तिमत्त्व रतन गुलाब चौधरी यांनी दिवंगत कामगार नेते एन डी पाटील यांच्याबद्दलच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला जीवनात अनेक व्यक्ती भेटतात परंतु काही हृदयात कायम वास्तव्य करून राहतात त्यापैकीच एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणून एन डी होत असे त्यांनी सांगितले.
“मी अनुभवलेले एन डी पाटील नायगाव ता. हवेली जि. पुणे येथे यशवंत सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या उद्घाटनासाठी सन १९८७ साली शरद पवार व प्राध्यापक एन डी पाटील आले होते.त्या नंतरच्या काळात पाणीपुरवठा संस्थांना विज बिल भरणे अवघड होत गेल्याने,साखर कारखान्याकडून विज बिल भरण्यासाठी ॲडव्हान्स रक्कम दिली जात असे. वीज मंडळाकडून वीज आकारापेक्षा इंधन अधिभार जास्त आकारला जात होता त्यामुळे पाणीपुरवठा संस्था बंद होऊ लागल्या.आमच्या समूह ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच के डी चौधरी आणि प्राध्यापक एन डी पाटील यांचे असलेले संबंध त्यातून आम्ही वीज बिलांच्या समस्यावर मार्ग काढण्यासाठी परिसरातील पाणीपुरवठा संस्थांचे प्रतिनिधी त्यांना कोल्हापूर येथे भेटलो यावर पाटील हे कार्यकारी अभियंता, रास्ता पेठ पुणे येथे समक्ष येऊन अश्वशक्ती प्रमाणे विज बिल भरून घेण्यास भाग पाडले व मीटर प्रमाणे येणारे बिल थकबाकी म्हणून दाखवण्यात आले. याचा फायदा पुणे जिल्ह्यातील सर्वच पाणी पुरवठा संस्था व शेतकऱ्यांना झाला नंतरच्या काळात पुणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा संस्था महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन कोल्हापूर या संस्थेच्या सभासद झाल्या
शेती पंपाचे वीज बिलाचा इंधन अधिभार कमी करण्यासाठी एन डी पाटील यांनी दहा वर्षे शासनाशी संघर्ष केला शासकीय कार्यालये, मंत्रालय मुंबई येथे मोर्चे व आंदोलने केली . त्यात जिल्ह्यातील पाणी पुरवठा संस्थांनी भाग घेतला. त्यानंतर तत्कालीन ऊर्जामंत्री अजित पवार यांनी २४ कोटी रुपये इंधन अधिभार माफ करून ती रक्कम वीज बिलाच्या थकबाकी मध्ये जमा करण्यात आली त्यानंतर सर्व संस्थांचा आर्थिक भार कमी झाला व संस्था सुरळीत पणे चालू लागल्या .
वीज बिलाची मोठी थकबाकी माफ करवून दिल्या बद्दल पुणे जिल्ह्यातील पाणी पुरवठा संस्था यांच्या वतीने प्राध्यापक एन डी पाटील व इरिगेशन फेडरेशनचे सर्व पदाधिकारी यांचा पुरोगामी माध्यमिक विद्यालय येथे विशेष सन्मान करण्यात आला .
शेतकरी व सर्वसामान्यांसाठी शेवटपर्यंत लढा देणाऱ्या या महान व्यक्तिमत्वास पुणे जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा संस्था व शेतकर्यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली.” रतन गुलाब चौधरी,संचालक ( पुणे जिल्हा) महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन कोल्हापूर
