पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)” राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारातून विचारांचे युवक शिक्षण क्षेत्रातून घडावेत”, असे मत प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी व्यक्त केले. अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ते बोलत होते. महाराष्ट्रावर अस्मानी-सुलतानी संकट असताना उत्तम प्रशासन, युद्धकौशल्य, नीतिमूल्ये यांचे शिक्षण देऊन हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याचे बाळकडू छत्रपती शिवरायांना राजमाता जिजाऊनी दिले होते. प्रतिकूल काळाशी झुंज देत अंधकारमय भूतकाळाच्या मुसक्या आवळून उज्ज्वल भविष्याचा वेध घेणारा महापुरुष त्यांनी घडवला . आपली संस्कृती जगभर ज्यांनी पोहचविली ते साहित्य, संस्कृती आणि इतिहासाचे विद्वान स्वामी विवेकानंद.”आपले ध्येय जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत युवकांनी न थांबता अविरत परिश्रम केले पाहिजे” हा संदेश जगभरच्या तरुणांना विवेकानंदांनी दिला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके व्यावसायिक विभागाचे उपप्राचार्य प्रा. अनिल जगताप, मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रविण ससाणे, डॉ. नानासाहेब पवार, डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. शुभांगी शिंदे, प्रा. भाऊसाहेब भोसले, प्रा. सागर कांबळे व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वंदना सोनवले यांनी केले तर आभार प्रा. संजीव पवार यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथालय विभाग व प्राध्यापक अनिता गाडेकर यांनी केले होते.
