संजय बोथरा,
चाकण, ( हवेलीनामा प्रतिनिधी) :
गेल्या अनेक दिवसांपासून तळेगाव – चाकण – शिक्रापूर या रस्त्याचे रखडलेले काम तातडीने करावे अन्यथा 20 जानेवारीपासून रस्ता रोखा व आमरण उपोषण करण्याचा इशारा येलवाडीचे माजी सरपंच नितीन गाडे यांनी दिला आहे. हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा झाला असून गेल्या तीन महिन्यात या रस्त्यावर झालेल्या अपघातात अनेक निष्पाप जीवांचे बळी गेले आहेत.
औद्योगिक वसाहतीमुळे अवजड वाहतूक, कामगार, विद्यार्थी , दुग्ध व्यवसायिक आदींची ये जा या मार्गावर सातत्याने होत आहे. याशिवाय मराठवाड्यातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकही याच मार्गावरून जास्त प्रमाणात होत असते. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून सुमारे 58 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.मात्र अंतिम मंजुरी अभावी हे काम रखडले असल्याचेही माहिती त्यांनी दिली . सुमारे 70 किलोमीटर अंतराची या मार्गाची दुरावस्था पावसाळ्यात झाली असून याच्या दुरुस्तीकडे शासकीय अधिकारी किंवा पदाधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याने आंदोलनाशिवाय पर्याय नाही असेही गाडे यांनी सांगितले.
