पुणे (हवेलीनामा वृतसमूह) राज्यात विविध जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले.यासाठी राज्य शासनाने ४ लाख ६ हजार ४३० हेक्टर क्षेत्रावरील बाधित शेतीपिकांसाठी ४८२ कोटी १० लाख ६९ हजार रुपयांच्या मदतीची मंजुरी दिली आहे.राज्य सरकार कडून याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी (ता.९) जारी केला आहे. यामध्ये दोन हेक्टरच्या मर्यादेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
राज्यात अतिवृष्टीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. राज्य शासनाच्या आकडेवारीनुसार जून ते सप्टेंबर दरम्यान ८४ लाख हेक्टरवरील शेती पिकं बाधित झाली. त्यासाठी राज्य सरकारने ३१ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. परंतु शासन निर्णयात मात्र मदतीचे दर आणि निकष जुनेच ठेवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची तुटपुंज्या मदतीवर बोळवण करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे विभागातील तीन जिल्हे
कोल्हापूर, पुणे आणि सांगली जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळीसाठी ११ कोटी ९० लाख १६ हजार रुपयांच्या वितरणास मंजूर देण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूरसाठी १ कोटी २५ लाख ६ हजार रुपये, पुणे जिल्ह्यासाठी १० कोटी ५९ लाख २६ हजार रुपये, सांगली जिल्ह्यासाठी ५ लाख ८४ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
