पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] (पुजारी सर) गेली एक तपापासून बंद पडलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची उर्जितावस्था येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नुकतीच भेट देऊन शेतकरी प्रतिनिधींसह सध्य परिस्थितीची पाहणी केली आणि अनेक गोष्टींवर भाष्य करीत या संदर्भात सभासदांशी संवाद साधून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी 11 मार्च रोजी थेऊर येथील चिंतामणी विद्यामंदीर प्रांगणात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी सांगितले आणि गेली जवळपास बारा वर्षानंतर याला थोडीफार गती मिळण्याच्या आशा निर्माण झाल्याची सभासदांमध्ये चर्चा आहे.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह यशवंत सहकारी साखर कारखाना प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष संजय गोंदे,सदस्य डी एन पवार, यशवंतचे माजी संचालक पांडुरंग काळे,पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे,साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे,रयत शेतकरी संघटनेचे रामदास कोतवाल, कार्याध्यक्ष हेमंत चौधरी,अरुण घुले, बाळासाहेब चोरघे,शालिवाहन काळभोर, वसंत शेवाळे,शिवराज काळभोर, सुखराज कुंजीर, एकनाथ काळे मुंबई महापौर केसरी आबा काळे प्रकाश पायगुडे,रमेश कुंजीर आदी मान्यवर याभेटीवेळी उपस्थित होते.त्यानी संपूर्ण कारखाना स्थळाची तेथील स्थावर – जंगम मालमत्तेची पाहणी केली आणि उपलब्ध इमारती अक्षरशः धुळ खात पडल्याचे निरिक्षण नोंदवले व बंद काळात यातील गोडाऊन भाड्याने दिले असते तरीही कारखान्याचा नियमित खर्च भागला असता यावर देखील ते बोलले.

कारखाना पूर्वपदावर यायचा असेल तर सभासदांनी योग्य निर्णय घेऊन पुढे जाण्यासाठीच सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले असून त्यात प्रामुख्याने मयत सभासदांच्या वारसांची नोंद करणे,संचालक मंडळ निवडी संदर्भात चर्चा करणे,गोडाऊन भाड्याने देण्याबद्दल चर्चा करणे,कारखान्याच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाची माहिती घेऊन ते काढण्यासाठी उपाययोजना करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात येईल असे सांगितले.
