नवी दिल्ली [हवेलीनामा वृत्तसमुह] आपल्या देशातील चित्ते नामशेष झाल्यानंतर भारताच्या चित्ता पुनरुज्जीवन प्रकल्पा अंतर्गत आफ्रिकेतून १२ चित्त्यांना घेऊन एक विशेष विमान आज मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे उतरले.
दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेल्या १२ चित्त्यांपैकी ७ नर आणि ५ मादी आहेत.काल शुक्रवारी संध्याकाळी हे चित्ते दक्षिण आफ्रिकेतील गौतेंग येथील टॅम्बो आंतरराष्ट्रीय विमानतळवरून भारतीय हवाई दलाच्या विमानातून भारताकडे रवाना झाले. यानंतर शनिवारी सकाळी हे १२ चित्ते मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर हवाई दलाच्या तळावर पोहोचले. त्यानंतर अर्ध्या तासाने त्यांना वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे १६५ किमी अंतरावर श्योपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्क येथे पोहोचविणत आले.
भारतातील कुनो येथे दुपारी 12 च्या सुमारास त्यांना त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या खास बोमामध्ये ठेवण्यात येईल, अशी माहिती देखील तज्ज्ञांनी दिली आहे. पार्कचे संचालक उत्तम शर्मा म्हणाले की, त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील चित्त्यांसाठी १० वेगळ्या ‘बोमाची’ व्यवस्था केली आहे. चित्त्यांना स्वीकारण्यासाठी आमची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
याविषयी अधिक माहिती देताना तज्ज्ञ म्हणाले, दक्षिण आफ्रिकेतील शिष्टमंडळाने गेल्या वर्षी 2022 मध्ये सप्टेंबरच्या सुरुवातीला कुनो उद्यानाला भेट दिली. तसेच जगातील सर्वात वेगवान प्राणी चित्त्याला राहण्यासाठी अभयारण्यातील व्यवस्था आणि वातावरण पोषक आहे का? याची पाहणी केली. त्यानंतर गेल्या महिन्यात दोन्ही राष्ट्रांमध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला.
भारतात आणलेल्या प्रत्येक चित्त्याची किंमत 3000 डॉलर असून एकूण 12 चित्ते आहेत. म्हणून चित्त्यांसाठी 36000 डॉलर भारत सरकारने दक्षिण आफ्रिकेला दिले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील हे चित्ते गेल्या वर्षीच येणार होते. तशी योजना सरकारकडून आखण्यात आली होती. मात्र दोन्ही देशांतील करारावर स्वाक्षरी न झाल्याने यासाठी विलंब झाला असल्याचे केंद्रीय मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
