पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] विद्यार्थ्यांना शाळेत माध्यान्ह भोजन अर्थात शालेय पोषण आहारच त्यांच्यासाठी जीवघेणा ठरताना दिसत आहे. पुण्यातील राजगुरुनगर तालुक्यातील एका शाळेत तब्बल 60 विद्यार्थ्यांना या भोजनातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडल्याची माहिती आहे. या सर्व विद्यार्थ्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
राजगुरुनगरमधील हुतात्मा राजगुरु विद्यालयात ही घटना घडली आहे. मुलांना दुपारच्या जेवणातून ही विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. शाळेत रोज मुलांना दुपारी जेवणाच्या सुट्टीत माध्यान्ह भोजन दिले जाते. आज देखील सुमारे 100 विद्यार्थ्यांनी हा खिचडी भात खाल्ला. त्यानंतर अर्ध्या तासांनी यातील 60 मुलांना विषबाधा झाल्याचे समोर आले. भात खाल्यानंतर मुलांना मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरु झाला. दुपारी सुमारे दोन वाजता हा प्रकार घडला आहे. तीन वाजता विषबाधा झाल्याचं समोर आल्यानंतर लगेच सर्व विद्यार्थ्यांना चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने सगळे विद्यार्थी सुखरुप असल्याची माहिती आहे.
याची माहिती पालकांना समजताच पालक रुग्णालयाकडे धावले. त्यांनी घडलेल्या सगळ्या प्रकारानंतर चांगलात संताप व्यक्त केला आहे. शाळा प्रशासनावर ते चांगलेच संतापले होते. मुलांच्या जीवाशी खेळ करु नका, अशी कळकळीची विनंती पालकांनी केली. सुदैवाने सगळे विद्यार्थी सुखरुप आहेत. मात्र 100 पैकी 60 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने सगळीकडून रोष व्यक्त केला जात आहे. आमच्या विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा आहे. त्यामुळेच आमच्या मुलांना त्रास झाला आहे.
अशा घटना अनेकवेळा घडत आहेत यावरून शासन याकडे गांभीर्यपूर्वक पाहणार आहे की नाही,माध्यान्ह भोजनाबाबत अनेकविध तक्रारी आहेत यावर कारवाई होणे आवश्यक आहे.
