पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) बैलगाडा शर्यत संबधी राज्य सरकार कुठलीही भूमिका घेत नसल्याने बैलगाडा मालक रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा पुणे जिल्हा बैल गाडा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष भाजप नेते जयसिंग एरंडे यांनी दिला आहे.मंचर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत एरंडे बोलत होते.
बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी राज्य सरकार बैलगाडा चालकांचा आणि मालकांचा अंत पाहत आहे. राज्य सरकारच्या हेकेखोर भूमिकेचा निषेध करण्यासाठी बैलगाडा मालक रस्त्यावर उतरणार असून शनिवारी दि.३० ऑक्टोबर रोजी मंचर ता. आंबेगाव येथील पुणे-नाशिक रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा एरंडे यांनी दिला आहे.
बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्याने ग्रामीण भागाचे अर्थकारण विस्कळीत झाले आहे. शर्यतीवर अवलंबून असणारे छोटे-मोठे घटक आर्थिक संकटात सापडले आहेत,अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्य सरकार अध्यादेश काढून शर्यत सुरू करेल असे सांगितले होते. त्यानंतर बैलगाडा मालकांमध्ये उत्साह संचारून शर्यतीच्या बैलांची खरेदी-विक्री वाढली. तालुक्यातच लाखो रुपयांचे शर्यतीचे बैल शेतकऱ्यांनी घेतले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत शर्यत सुरू होण्यासंदर्भात कुठलीही हालचाल झालेली नाही. राज्य सरकार यासंदर्भात कोणतीही भूमिका घेत नसल्याने बैलगाडा मालक रस्त्यावर उतरणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
