अतुल देशपांडे,
सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) वाई शहर व परिसरातूनगहाळ झालेले सुमारे सहा लाख रुपये किमतीचे ३० मोबाईल वाई पोलिसांनी हस्तगत केले. त्यानंतर मूळ तक्रारदारांना मोबाईल परत मिळाल्याने समाधान व्यक्त केले.
वाईच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या हस्ते मोबाईल फोन तक्रारदारांना परत देण्यात आले. पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर व उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गहाळ झालेले मोबाईलचा तत्काळ शोधघेण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार तांत्रिक विश्लेषण करत महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून गहाळ मोबाईल शोध घेऊन सहा लाख रुपये किमतीचे ३० मोबाईल ताब्यात घेतले. हे मोबाईल तक्रारदार यांना परत केल्याने पोलिस प्रशासनाबाबत समाधान व्यक्त होत आहे.
या कारवाईत तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक वाळुंज, पोलिस कॉन्स्टेबल विशाल शिंदे, हेमंत शिंदे, नितीन कदम, श्रावण राठोड, महेश पवार (सायबर) यांनी सहभाग घेतला. पोलिस अधीक्षक तुषार दोशी व अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी वाई तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.
