दौंड (हवेलीनामा प्रतिनिधी) दौंड तालुक्यातील खामगाव–तांबेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचालीत मोठी वाढ झाली असून ग्रामस्थ व शेतकरी प्रचंड दहशतीखाली आहेत. पहाटे आणि रात्री बिबट्या दिसत असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
या परिसरात गेल्या काही दिवसांत बिबट्याने शेळ्या, मेंढ्या,पाळीव जनावरे यांच्यावर सतत हल्ले केले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. खामगावमधील जगताप कुटुंबाच्या गोठ्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका वासराचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण खामगाव–तांबेवाडी परिसर भीतीचे वातावरण आहे.

येथील स्थानिक युवा उद्योजक राहुल कुंजीर यांनी सांगितले,“बिबट्याचा वावर इतका वाढला आहे की शेतात काम करणे अवघड झाले आहे घराबाहेर पडणे धोकादायक झाले आहे. वनविभाग आणि प्रशासनाने तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.
या परिसरातील नागरिकांच्या मागण्या –
१) खामगाव–तांबेवाडी परिसरात तातडीने पिंजरे लावावेत
२) वनविभागाची गस्त वाढवावी
३) ड्रोन / कॅमेरा ट्रॅपद्वारे बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घ्यावा
४) सुरक्षेसाठी विशेष पथकाची नेमणूक करावी
५) जनावरांच्या नुकसानीची त्वरित भरपाई द्यावी.
