पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) महाराष्ट्राच्या दैदीप्यमान इतिहासात अनेक रोमांचित घटना घडल्या आहेत त्यातील सन १६८९ च्या श्रावण अमावस्येला सरसेनापती संताजी घोरपडे यांनी तुळापूर येथे औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा सूड उगवला होता.ही मराठा साम्राज्यातील सर्जिकल स्ट्राइक होते. वीर संतजींच्या पराक्रमाची प्रेरणादायी स्मृती जपण्याच्या उद्देशाने धर्मवीरपीठ श्री क्षेत्र तुळापूर पंचक्रोशीतील शंभूभक्तांनी श्रावण आमावस्येला “सरसेनापती शौर्यदिन” साजरा केला. या कार्यक्रमासाठी तुळापूरच्या पंचक्रोशीतील अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

याप्रसंगी प्रास्ताविक भाषणात जेष्ठ शंभूभक्त सुभाष गायकवाड उर्फ बंधु यांनी सांगितले की संपूर्ण महाराष्ट्राला स्फूर्ति देणारी ही घटना आहे. या घटनेचे स्मरण करून आपल्याला पराक्रमी पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे”.

त्यानंतर बोलताना ज्येष्ठ शंभूभक्त मिलिंद एकबोटे यांनी सांगितले की “भारतामध्ये सध्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. या तरुणांना प्रेरणा देणारा आपल्या पराक्रमी आणि राष्ट्रभक्त पूर्वजांचा इतिहास सांगणे ही आजची गरज आहे. त्यादृष्टीने सरसेनापती संताजी घोरपडे यांचा शौर्यदिन साजरा करणे या अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.”

प्रमुख व्यक्ते इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या झंझावाती जीवनचरित्राची मांडणी केली. ते म्हणाले “औरंगजेबाच्या सैन्यबळासमोर अत्यंत कमी लष्करी ताकद असूनही संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणाचा लढा सर्व सामर्थ्यानिशी दिला. त्यांनी एकाचवेळी मोगल, पोर्तुगीज आणि जंजिऱ्यांच्या सिद्धी या तिन्ही शत्रूंशी संघर्ष केला.संताजींचे वडील म्हाळोजी घोरपडे यांनी संकट प्रसंगी संभाजी महाराजांना मोलाची साथ दिली होती. त्यांचे मुकर्रब खानाशी लढाई करताना बलिदान झाले होते. संभाजी महाराजांच्या बलिदानाचे अंगावर शहारे आणणारे वर्णन श्री.बलकवडे यांनी केले.

“संभाजी महाराजांनी इस्लामधर्म स्वीकारण्याची औरंगजेबाची अट धुडकावून लावल्यामुळे त्यांना प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या परंतु अत्याचार करून संभाजी महाराजांना शरण आणण्याची औरंगजेबची पाशवी ईच्छा कधीही पूर्ण झाली नाही”.त्याने श्रीशंभूछत्रपतींवर केलेल्या अत्याचारांमुळे संतप्त झालेल्या संताजीने श्रावणी अमावस्याला त्याच्या छावणीवर हल्ला करून त्याला संपवण्याचा धाडसी बेत रचला. मोजक्या लोकांना घेऊन संताजी मध्यरात्री तुळापूर येथे पोहोचून ‘गुलालबार’ या बादशहाच्या तंबूपर्यंत पोहोचले, परंतु दुर्दैवाने औरंगजेब त्यारात्री दुसऱ्या ठिकाणी झोपायला गेल्यामुळे सापडू शकला नाही. सेनापतींनी गुलाबबारचे दोर कापून तो तंबू जमीनदोस्त केला आणि कोसळलेल्या तंबूवरील चाँदताऱ्याचा सोनेरी कळस कापून काढला. अत्यंत वेगाने औरंग्याच्या छावणीपर्यंत पोहोचलेल्या या शूरवीराने तितक्याच वेगाने तिथून बाहेर पडण्याची युक्ति साधली त्यानंतर संताजी घोरपडे सिंहगड किल्ल्यावर पोहोचले. या घटनेमुळे बादशाहासकट सगळे मोगल सैन्य हादरले. सर्वांच्या झोपा उडाल्या होत्या. संताजींच्या नावाची प्रचंड दहशत मोगली सैन्यामध्ये निर्माण झाली होती. संताजींच्या सर्जिकल स्ट्राईकचे वर्णन ऐकून सर्व समुदाय भारावून गेला होता. समारोपाचे वेळी. श्री.बलकवडे म्हणाले की “आज हिंदुस्थानच्या संस्कृतीवर हल्ला करणारे प्रकार घडत आहेत. अशावेळी श्रीसंताजी घोरपडेंप्रमाणे साहस आणि पराक्रम करून तरुणांनी आपली भूमिका पार पाडली पाहिजे.

या कार्यक्रमाला *शिवाजी शिवले, रोहिदास उंदरे, माऊली शिवले, नंदकुमार दाभाडे, लक्ष्मण तापकीर, सुरेशबापू सातव, बाळासाहेब सातव, राहुल शिंदे, दत्ताआबा गायकवाड बाप्पू शिवले,नवनाथ शिवले, गणेश हुलावळे, वाल्मिक भोंडवे, सुभाष पवळे इ. मान्यवर उपस्थित होते. सरसेनापती संताजी घोरपडे यांचे वंशज श्री. शामराव दाभाडे यांनी यावेळी सपत्निक उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.*

याप्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय, फुलगाव तसेच तुळापूर येथील माध्यमिक विद्यालय या दोन्ही शाळेमधील विध्यार्थी विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *