पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पूर्व हवेलीतील थेऊर लोणी-काळभोर तसेच उरुळीकांचन येथे आठवडे बाजार भरतात यातून मोठी उलाढाल होते.सर्वसामान्य नागरिकांसाठी दैनंदिन जीवनातील वस्तू तसेच भाजीपाला खरेदीचा दिवस असतो.परंतु गेल्या काही महिन्यांपासून या आठवडे बाजारातून मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला असून यावर पोलीस प्रशासन काहीच हरकतीत आलेले दिसत नाही त्यामुळेच या चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
थेऊर येथे दर बुधवारी आठवडे बाजार भरतो यासाठी आजुबाजुंच्या गावातील नागरिक दैनंदिन लागणार्या वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी करतात. ग्रामपंचायत कार्यालयाला लागूनच आठवडे बाजाराची जागा आहे दरवेळेला मुख्य प्रवेशद्वारावर फळविक्रेत्यांचे आक्रमक असते त्यामुळे बाजार खरेदीच्या वेळी येथे कोंडी होते.बाजारात प्रत्येक प्रकारास वेगवेगळ्या जागा निश्चित करून दिल्यास प्रवेशद्वारावरील फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण दूर होईल परिणामी दाटी कमी होऊन सुटसुटीतपणा येईल. गर्दी अधिक असल्यास चोरांना अधिक मुभा मिळते त्यामुळेच मोबाईल चोर्या अधिक वाढल्या आहेत.
अशीच परिस्थिती लोणी-काळभोर तसेच उरुळीकांचन येथे अनुभवास येते.मोबाईल चोरीस गेल्यावर ते पुन्हा परत मिळण्याच्या शक्यताच नाही.यावर आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून विशेष प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
