पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] देशात किडनी आणि यकृत प्रत्यारोपणाची गरज दिवसेंदिवस वाढत असून प्रत्येकी २ लाख रुग्णांना गरज असताना केवळ ६ हजार रुग्णांनाच हे अवयव उपलब्ध होऊ शकत आहेत. याशिवाय प्रतिवर्षी हृदय प्रत्यारोपणाची गरज भासणाऱ्या ५० हजार जणांचा मृत्यू होत असताना प्रत्यारोपणसाठी केवळ १० ते १५ रुग्णांनाच हृदय उपलब्ध होते. या पार्श्वभूमीवर अवयवदानासंदर्भातील जनजागृती हा महत्त्वाचा सामाजिक विषय असल्याचे प्रतिपादन दिग्दर्शक राहुल पणशीकर यांनी केले.

राहुल पणशीकर दिग्दर्शित व राहुलस् ग्राफिक्स या संस्थेच्या वतीने निर्मित अवयवदानावर भाष्य करणाऱ्या ‘राख’ या लघुपटाचे प्रदर्शन नुकतेच राष्ट्रीय चित्रपट (एनएफएआय) येथे झाले. त्यावेळी पणशीकर बोलत होते. फ्लिटगार्ड फिल्ट्रमचे अध्यक्ष संजय कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक निरंजन किर्लोस्कर, विपणन व ब्रँडिंग प्रमुख पीयूष श्रीवास्तव आदी यावेळी उपस्थित होते.

मोहन जोशी यांची प्रमुख भूमिका असलेला राख हा लघुपट एका उतारवयातील यशस्वी उद्योजकाची अवयवदान जनजागृतीची तळमळ आपल्या समोर मांडतो. आज आपल्या वैयक्तिक आयुष्यात पैसा आणि चैन याहीपलीकडे अवयवदान या एका कृतीतून समाजासाठी काहीतरी भरीव काम करण्याचा व्यक्त संदेश या लघुपटातून देण्यात आला असल्याचे राहुल पणशीकर यांनी सांगितले.एका व्यक्तीने अवयवदान केले तर ८ रुग्णांचे प्राण वाचू शकतात त्यामुळे याबद्दल जागृती व्हावी.याच उद्देशाने या लघुपटाची निर्मिती आम्ही केली असल्याचेही त्यांनी सांगितले. सामाजिक भान जागृत करत या लघुपटात देण्यात आलेला अवयवदानाचा संदेश हा नागरिकांच्या थेट मनाला भिडेल असा विश्वास यावेळी पियुष श्रीवास्तव यांनी केला. नजीकच्या भविष्यात जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत सदर लघुपट पोहोचावा या उद्देशाने स्पर्धांसोबतच अनेक ठिकाणी आम्ही त्याचे प्रदर्शन करू असेही पणशीकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *