मुंबई [हवेलीनामा वृत्तसमुह] खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी विधीमंडळात या मुद्द्यावर मोठा अक्षेप घेत हक्कभंगाची मागणी केली आहे. यानंतर संजय राऊतांवरील हक्कभंगाबाबत चौकशी करुन दोन दिवसांत चौकशी करुन ८ मार्च रोजी निर्णय घेणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं.यासाठी पंधरा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष राहुल कुल असणार आहेत.
हक्कभंगा संदर्भात कारवाई करण्यासाठी विधिमंडळात जलद गतीने घडामोडी घडत असून विधानसभा अध्यक्षांकडून लगेच नव्याने हक्कभंग समिती स्थापन करण्यात आली आहे. अध्यक्षांकडून १५ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्याकडे देण्यात आले आहे. तर या समितीत भाजपाचे आमदार नितेश राणे, अतुल भातखळकर, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचाही समावेश आहे. या समितीकडून संजय राऊतांना लगेच कारणे दाखवा नोटीस बजावण्याची शक्यता आहे. त्यानंतर संजय राऊत यांना पुढच्या ४८ तासांत उत्तर द्यावे लागेल, अशी माहिती समोर येत आहे.
