पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) स्वार्थापोटी मानव अशांतता पसरविण्याचे षडयंत्र करत असून यातूनच जगात दहशतवाद रक्तपात पसरतोय  अशावेळी संतांची भूमी महाराष्ट्र जगाला विश्वशांती, बंधुत्व आणि मानवी कल्याणाचा संदेश देण्याचे कार्य करेल. तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा विचार या भूमीतून जगापर्यंत पोहचेल. महाकराष्ट्राने देशाला वैचारिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विचार दिला. आता विश्वाला शांतीचा मार्ग दाखविण्याचे कार्य महाराष्ट्र करेल अशी भावना भटक्या विमुक्त जमाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा इदाते यांनी व्यक्त केली.

         माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी राजबाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात मोठा विश्वशांतीचा घुमटात श्रीमद् भगवद्गीता ज्ञानभवनाचा लोकार्पण सोहळा आणि तीन दिवसीय विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित आठव्या वर्ल्ड पार्लमेंटच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी आयोध्या येथील श्रीराम जन्मभुमी शिलान्साचे माजी अध्यक्ष डॉ. रामविलास वेदांती, हनुमानगडीचे प्रमुखे महंत रामदास, संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, प्रा. स्वाती चाटे कराड, डॉ. सुचित्रा नागरे- कराड, डॉ. आर. एम चिटणीस आणि डॉ. मिलिंद पांडे हे उपस्थित होते.
        डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले की,“ हा घुमट केवळ वास्तू नाही, तर आध्यात्माचा संदेश देणारे मंदिर आहे. विज्ञान आणि आध्यात्म एकत्र आल्यास होलिस्टिक जगाची निर्मिती होईल. आईन्स्टाईन आणि महात्मा गांधी यांच्या विचारानेच जगाला शांतता मिळेल. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. कर्नाटक मध्ये शाळकरी मुलीने हिजाब घातल्याचा वाद होतो. खाण्यापिण्यावरून वादंग निर्माण होते, हे सर्व अशांतता आणि युद्धाचे कारण आहे. गीता ज्ञान भवनाचा लोकार्पण जगासाठी महत्वाचा आहे. शाश्वत तंत्रज्ञानाचा सर्वात पद्धतशीर सारांश गीतेमध्ये आहे. विचार, आचार आणि मुल्य संवर्धन हा जीवनाचा सार सांगणार शास्त्र आहे.
           डॉ. विजय भटकर म्हणाले,“ मानवजातीला या परिषदेतून कल्याणाचा मार्ग दाखविला जाईल. विज्ञान, धर्म आणि तत्वज्ञान यांच्या एकत्रिकरणातूनच विश्वशांती प्रस्थापित होईल. विद्यार्थ्यांना आध्यात्माचे शिक्षण अशा धर्म परिषदेतून मिळेल. सत्याची अनुभुती ही आध्यात्मातूनच मिळू शकेल. जगाच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.”
      प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड म्हणाले,“ सर्व धर्म ग्रंथ हे खरे जीवन ग्रंथ आहे. जगण्याची कला ही धर्मग्रंथ शिकवतात. इंद्रायणी ज्ञानाची भूमि असून बद्रीनाथ हे त्या भूमिचा माथा आहे. धर्म केवळ संकल्पना नसून ती विश्वकल्याणाची गाथा आहे. श्रद्धेला अंधश्रद्धाची जोड देऊन नका, श्रद्धेतून मानवकल्याणाची दिशा ठरवा”.
            या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गौतम बापट यांनी केले. एमआयटी डब्ल्यू पी यु चे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *