राजगुरुनगर (हवेलीनामा ऑनलाइन) राजगुरूनगरचा दर शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात यावा, अशी मागणी राजगुरुनगर शहरातील ग्राहक व व्यापारी बांधव यांनी केली आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यापासून बंद असलेला हा बाजार पुन्हा सुरू करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांनी केली केली होती. त्याअनुषंगाने ग्राहक हक्क समितीचे अध्यक्ष रंगनाथ सुतार तसेच व्यापारी महासंघाचे रवींद्र गुजराथी, छगनलाल ओसवाल, प्रा. बाळासाहेब शिंदेकर, विद्याधर साळवे यांनी राजगुरुनगर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निवेदीता घार्गे यांची भेट घेऊन यासंबंधीच्या मागणीची पूर्तता करावी, अशी मागणी केली. तसेच कोरोनाचा प्रादूर्भाव शिथिल झाल्यामुळे बहुतेक सर्व जिल्ह्याच्या सर्व क्षेत्रातील व्यापार-उदीम सुरू झाला असून याबाबतही नागरिकांच्या मागणीचा विचार करावा, असे गुजराथी यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, याबाबत बोलताना मुख्याधिकारी घार्गे म्हणाल्या की, शुक्रवार (दि. १९) पासून राजगुरुनगरचा आठवडी बाजार पूर्वीप्रमाणेच गढई मैदान येथे भरविण्यात येईल. नागरिक, शेतकरी तसेच व्यापाऱ्यांनी सामाजिक अंतर राखून व मास्क लावून स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेऊन बाजारातील व्यवहार करावेत. असे आवाहन ग्राहक हक्क समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
