थेऊर (हवेलीनामा) हवेली तालुक्यातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊरला काळजीवाहू ग्राम अधिकाऱ्यावर कामकाज करणे अवघड झाले असून नागरिकांच्या अडचणी बरोबरच कार्यालयीन कामकाजावर देखील मर्यादा येत आहे. सध्या नियुक्ती असलेले अधिकारी कसलीही सूचना न देता अनुपस्थित राहतात विशेष म्हणजे त्यांचा संपर्क देखील होणे अवघड होते. शासकीय नियमानुसार ग्राम अधिकारी यांनी पूर्णवेळ मुख्यालयी राहणे अपेक्षित आहे परंतु हा नियम कुठेही पाळला जात नाही. गावात काही महत्त्वपूर्ण घटना घडल्यास संबंधित अधिकारी तेथे उपस्थित असणे आवश्यक आहे परंतु बहुतेक ठिकाणी असे चित्र आढळून येत नाही.
थेऊर ग्रामपंचायतीवर गेल्या दोन महिन्यापूर्वी ग्राम अधिकारी नियुक्त देण्यात आलेल्या अधिकाऱ्यास थेऊरसह हवेलीतील अन्य दोन गावाचा चार्ज असल्याचे कळले त्यामुळे त्यांना कोणत्याही एका गावावर लक्ष केंद्रित करणे अवघड झाले परंतु तीर्थक्षेत्र थेऊर हे लोकसंख्येने तसेच तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी महत्त्वाच्या घटना घडत असतात त्यामुळे आज पर्यंत येथे पूर्ण वेळ ग्राम अधिकारी नियुक्ती केली जात असे परंतु यावेळी देण्यात आलेल्या ग्राम अधिकाऱ्यांवर अन्य गावाचाही चार्ज असल्याने त्यांना या ठिकाणी लक्ष देणे अवघड होते यावर प्रशासकीय मंडळाने काही दिवसांपूर्वी हवेलीचे गटविकास अधिकारी यांना पत्र देऊन थेऊर साठी पूर्णवेळ ग्राम अधिकारी उपलब्ध व्हावा अशी मागणी केली होती परंतु त्यावर आज तागायत कसलेही कार्यवाही झाली नाही.
सध्या नियुक्तीस असलेले ग्राम अधिकारी गेल्या आठवड्यात महत्त्वपूर्ण असलेल्या ग्रामसभेस अनुपस्थित होते इतकेच नव्हे तर आज पर्यंत 15 ऑगस्ट रोजी पार पडणाऱ्या स्वातंत्र्य दिन ध्वजारोहणासाठी ग्राम अधिकारी अनुपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ असावी त्यामुळे हाही एक महत्त्वपूर्ण विषय घेऊन गावात चर्चिला जात आहे.
माझा गाव माझा विकास अर्थात जीपीडीपी या विषयावर गावच्या विकास आराखड्याची चर्चा होण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या ग्रामसभेला ग्रामअधिकारीच उपस्थित राहिले नाहीत त्यामुळे या विषयाचे गांभीर्य नेमके कोणाला नाही हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.या सर्व घटनाक्रमानंतर या ग्राम अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकारी यांना याची कल्पना दिली होती काय त्यांनी आगाऊ रजा मंजूर केली होती काय याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
