मुंबई [हवेलीनामा वृत्तसमुह]
राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी घोषित केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवरील मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेची कार्यवाही सुरु झाली असून एप्रिलनंतर राज्यातील ७९ लाख २७ हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे सोळाशे कोटी दिले जाणार आहेत.
१ फेब्रुवारी २०१९ पूर्वी ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, त्यांनाच योजनेचा लाभ मिळेल, अशी माहिती मिळाली आहे. योजनेचा लाभ नवीन आर्थिक वर्षापासून दिला जाणार असून सरकारने कृषी विभागाकडून माहिती संकलित केली आहे. एकाच सातबारा उताऱ्यावरील कुटुंबप्रमुख त्याची पत्नी व १८ वर्षांखालील दोन अपत्य, असे कुटुंब ग्राह्य धरून त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये केंद्र सरकारकडून मिळतात. वर्षातून तीनवेळा प्रत्येकी दोन हजारांप्रमाणे सहा हजार रुपये वितरित केले जातात. केंद्र सरकारच्या योजनेचेच निकष मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधीसाठी लागू असणार आहेत. योजनेसाठी क्षेत्राची कोणतीही मर्यादा नाही, पण जमीन लागवडीयोग्य असावी, बंधनकारक आहे.
