पुणे (हवेलीनामा आॕनलाईन)
बसवेश्वरांनी १२ व्या शतकात केलेल्या समाजक्रांतीची आज गरज आहे, जात, धर्म भेद विसरून सामाजिक समता नांदावे हीच इच्छा बसवेश्वरांची होती. त्यांच्या विचाराची आज समाजाला गरज आहे, त्यामुळे प्रत्येकाने बसवेश्वरांचे विचार आचरणात आणावेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केले.
महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ड्रीम फाउंडेशनच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्रातून 47 मान्यवर बसव विचार, कायम योगी, कर्मयोगी, सामाजिक कार्यकर्त्यांचा ड्रीम फाउंडेशन व बसव अकॅडमी पुणे तर्फे सत्कार करण्यात आला. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न खंबीरपणे मांडणारे आणि सामान्यांना ज्ञान मिळवून देण्यात महत्वाचा वाटा उचलणारे प्रतिक गंगणे यांना यावर्षीचा राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार प्रतिक गंगणे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी जनसेवा बँकेचे डॉ. राजेंद्र हिरेमठ, ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ भतगुणकी, भाजपा युवा मोर्चाचे संकेत खारपुडे, माजी नगरसेवक पुणे मनपा लक्षमीबाई घोडके, कॅप्टन आशा शिंदे, उद्योजक शंकरराव अक्कलकोटे, शिक्षणतज्ञ मल्लिकार्जुन नावंदे, ह भ प स्वामीराज भिसे, शिवव्याख्याते विक्रमसिंह मगर यांच्यासह सोलापूर, पुणे, लातूर, गोंदिया, अकोला, कोल्हापूर, नगर सांगली येथील बसवप्रेमी उपस्थित होते.
प्रतीक गंगणे म्हणाले, हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून मला सहकार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींचा आहे. या पुरस्कारामुळे अजून जोमाने काम करण्यास प्रोत्साहन मिळते. पुरस्काराने अजून जबाबदारी वाढली आहे. येत्या काळात अजून चांगले कार्य कसे करता येईल याचा मी प्रयत्न करणार आहे.
