पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) गेल्या काही दिवसांपासून जवळपास सर्वच शासकीय कार्यालयात खाजगी इसमाचा (एजंटांचा) वावर वाढला असून सर्वसामान्य माणसाला कोणतेही काम वेळेत पूर्ण होत नाही यासाठी मध्यस्थाची आवश्यकता भासत आहे, भ्रष्टाचाराचे मूळ इतके खोल रुजलेले आहे की तो सध्या सोपस्कार होऊन बसला आहे त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेची कामे कधीच वेळेत पूर्ण होत नाहीत
सामान्य नागरिकांना नियमितपणे आवश्यक असलेल्या सेवा म्हणजे वीज, महसूल, नगर नियोजन,प्रादेशिक परिवहन या कार्यालयाशी संबंध येतो परंतु अलीकडे सरकारी बाबू लवकर भेटत नाहीत आणि भेटले तर अनेक बहाणे करून त्याला बेजार करतात यातून सुटका हवी असल्यास कार्यालयात वजन असलेल्या खाजगी इसमाचा आधार घ्यावा लागतो कोणतेही काम मग ते कसेही असो त्याला मार्ग निघतोच परंतु त्यासाठी थोडा आर्थिक भार सहन करावा लागतो
असाच काही अनुभव वीज वितरण कंपनीत येत असून अनेक कामे अशा खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून होत आहेत पूर्व हवेलीत अशा व्यक्तीचे पेव फुटले असून यावर कोणतीच यंत्रणा नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम दिसत नाही यामुळे सामान्य माणसाची मात्र फरफट होत आहे यावर कोणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्याची भविष्यात मोठी कोंडी केली जाते देश स्वतंत्र झाला परंतु सामान्य जनतेच्या समस्या आणखी तशाच मग त्या दूर करण्यासाठी किती वेळा आणि कोणाकडे जायचे.
नागरी सुविधा पुरविणे स्थानिक स्वराज्य संस्थेचे काम आहे परंतु यातही अनेक अडचणी निर्माण केल्या जातात नागरिकांचे अधिकार डावलण्यात येतात परंतु मध्यस्थी असेल तर अडचण नाहीच सर्व गोष्टी व्यवस्थित होतात.
जोपर्यंत या खाजगी व्यक्तींची लुडबुड थांबणार नाही तोपर्यंत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर तोडगे त्वरित निघणार नाहीत.शासन मान्यता प्राप्त ठेकेदार कोण त्याची यादी प्रत्येक कार्यालयात लावणे व डमी ठेकेदारावर कारवाई होणे आवश्यक आहे अन्यथा सामान्य माणूस असाच भरडला जाणार
