पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेले नऱ्हे गाव गेल्या सहा महिन्यापासून मूलभूत सुविधांसाठी लढा देत आहे. आतापर्यंत १०५ निवेदने आणि अनेक आंदोलने करून देखील प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली नऱ्हे ग्रामस्थांनी धायरी फाटा ते वडगाव पुलापर्यंत प्रतिमात्मक बैलगाडी आणि हंडा मोर्चा काढत रोको आंदोलन करताना पुणे मनपाचा निषेध नोंदवला.
पालिकेत समाविष्ट झालेल्या गावांकडून आतापर्यंत साधारणपणे ३४ कोटी मालमत्ता कर पालिकेकडे जमा झालेला असताना देखील सहा महिन्यांमध्ये समस्त गावात पालिकेला मूलभूत सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत. सध्या दिवसेंदिवस कचरा आणि नाले प्रश्न तीव्र होताना दिसत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून महापालिकेला नऱ्हे येथील कचरा आणि तुंबलेली नाले याचा प्रश्न सोडवला नाही, त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या असे असताना देखील कचरा संकलनासाठी नागरिकांना आता प्रत्येक घराला ७५ रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांवर आर्थिक भुर्दंड देखील बसत आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा पथ दिव्यांचा अभाव आणि खड्डेमय रस्ते रस्त्यांमुळे अपघातात वाढ झालेली दिसून येत आहे. तरी पालिकेने वरील सर्व प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत अशी मागणी यावेळी भूपेंद्र मोरे यांच्याकडून करण्यात आली.

यावेळी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता व्यंकटेश पाटील यांनी विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले, व मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका दिवसात संपूर्ण साफसफाई केली गेली गेल्या कित्येक दिवसापासून नरे परिसरामध्ये कचऱ्याचे साम्राज्य साठले होते. आंदोलन करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने जेसीबी आणि डंपर च्या साह्याने दिवसभरात नऱ्हे गावात कचरा साफ सफाईचे काम जोरदार सुरू होते. त्यामुळे याची चर्चा नऱ्हे गावात पाहायला मिळाली.
