थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) देहूगाव येथे इंद्रायणी नदीत बांधकाम मजुराची दोन लहान मुले बुडून मृत्यू पावल्याची दुदैवी घटना घडली आहे. साहील विजय गौड ( वय १० वर्षे ) व अखिल विजय गौड ( वय ८ वर्षे, सध्या राहणार देहूगाव,मुळगाव, गोरखपूर) आहे. ही मुले सकाळी इंद्रायणी नदीकाठी गेली होती. नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुले नदीच्या पाण्यात बुडाली असल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच मुलांच्या वडिलांनी व इतर बांधकाम कामगारांनी पाण्यात शोधाशोध केली. मात्र त्यांचे मृतदेह हाती लागले नाहीत. घटनेमुळे कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे.कार्तिकी एकादशी असल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने इंद्रायणी नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. मृत मुलाचे आई वडील इंद्रायणी पुला जवळ चालू असलेल्या बांधकामावर कामगार म्हणून काम करतात. मजुरीच्या कामासाठी उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथून हे कुटुंब येथे आले आहे.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दळवी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुलांच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पी एम आर डी एचे अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरू आहे. त्यांना मदतीसाठी एनडीआरएफच्या जवानांना देखील बोलावण्यात आलेले आहे.नदीमध्ये शोधकार्य सुरु असून अद्याप मुलांचा शोध लागलेला नाही.
