मुंबई (हवेलीनामा वृत्तसमुह) भारतीय उद्योग क्षेत्रातील महान व्यक्तिमत्व पद्मविभूषण रतनजी टाटा यांचे निधन झाले.त्यांचे कार्य सर्वश्रुत असून प्रत्येक भारतीय मनात आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने उद्योग जगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

अनेक महान विभूतींपैकी एक असलेल्या भारतीय पुत्रास खरा सन्मान म्हणजे भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात यायला हवे होते परंतु तसे झालेल नाही याची खंत भारतीय मनात दिसून येत आहे.कोणत्याही भारतीय सुपुत्रास या सर्वोच्च नागरी सन्मान हयातीत प्रदान करण्यात यायला हवा अशीच काहीशी भावना यावेळी दिसून येते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आज एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहून उद्योजक रतनजी टाटा यांना भारतरत्न या बहुमानाने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

त्यांनी आपले हे पत्र ‘एक्स’ या ट्विटर हँडल वर टाकले आहे.

                “ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. पण भारतीय उद्योगजगाला, भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच ‘भारतरत्न’सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे , तसच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही ! 
काल रतन टाटांच्या निधनाची बातमी बाहेर आल्यावर अनेक ठिकाणचे कार्यक्रम लोकांनी स्वतःहून थांबवून श्रद्धांजली वाहीली , मुंबईत तर काही ठिकाणी दांडिया देखील अर्ध्यावर थांबवून लोक २ मिनीट स्तब्ध उभे राहीले ! आज सकाळपासुन सोशल मीडियावर तमाम भारतीय उस्फुर्तपणे श्रद्धांजली वाहत आहेत, आणि प्रत्येकाच्या मनातील भाव असा आहे की आपल्या अगदी घरातील कोणीतरी व्यक्ती गेली आहे. अशा व्यक्ती ह्या ‘भारतरत्न’च नाहीत तर काय मग अजून ? 
         त्यामुळे याबाबतीत तुम्ही संबंधितांना निर्देश देऊन यावर काही निर्णय घ्याल याची मला खात्री आहे. 
              तसंच भारत हा रत्नांची खाण आहे. पण या रत्नांचा सन्मान कुठल्याही नागरी सन्मानाने करताना तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर व्हावा. मुळात कोणाला मरणोत्तर सन्मान घोषित करायची वेळच येऊ नये. त्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती हयात असताना आणि शारीरिक दृष्ट्या उत्तम अवस्थेत असताना झालेला कधीही चांगला. 
आपण अनेकदा बघतो की एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना होतो, हे योग्य नाही. या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे.” 
राज ठाकरे ।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *